जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी (Rajouri) येथील रहस्यमयी मृत्यूंच्या चौकशीसाठी एम्स आणि पीजीआय चंदीगडचे (AIIMS and PGI Chandigarh) पथक जीएमसी राजौरी (GMC Rajouri) येथे पोहोचले. पथकांनी 11 रुग्णांशी बोलून त्यांचा क्लिनिकल इतिहास जाणून घेतला. या पथकाने रुग्णांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांशीही चर्चा केली.
दिल्ली एम्समधील (Delhi AIIMS) 5 डॉक्टरांचे पथक बधल गावालाही भेट देणार आहे. ही टीम सीलबंद घरे आणि मृत्यू झालेल्या तीन कुटुंबांच्या आसपासच्या भागातून नमुने घेणार आहे. दिल्ली एम्सच्या (Delhi AIIMS) टीममध्ये टॉक्सिकोलॉजी तज्ज्ञांचाही (Toxicology experts) समावेश आहे. एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. एम श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजीचे (Toxicology) प्राध्यापक डॉ. ए. शरीफ, ॲनेस्थेसिया आणि क्रिटिकल केअरचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. जमद नायर, बालरोगशास्त्राचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. जगदीश प्रसाद मिना, क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जावेद कादरी यांचा समावेश आहे.
राजौरीमध्ये (Rajouri) आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद अस्लमच्या (Mohammad Aslam) सहाव्या आणि शेवटच्या मुलाचा 19 जानेवारीला बधल गावात जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. यानंतर गावात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली.
200 लोकांना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले
25 जानेवारी रोजी मृतांच्या जवळपास 200 जवळच्या नातेवाईकांना आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. आजही सुमारे 14 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जीएमसी राजौरीचे डॉक्टर 11 रुग्णांवर एट्रोपीन नावाच्या विष विरोधी औषधाने उपचार करत आहेत.